महागाईपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा   

मे महिन्यात किरकोळ महागाई ६ वर्षांच्या नीचांकी पातळीवर

नवी दिल्ली : महागाईच्या आघाडीवर सामान्य माणसाला दिलासा देणारी बातमी आहे. भाज्या आणि फळांच्या किमती कमी झाल्यामुळे, किरकोळ महागाई सहा वर्षातील नीचांकी पातळीवर आली आहे. मे महिन्यात किरकोळ महागाई दर २.८२ टक्क्यांनी घसरला आहे. गुरुवारी जारी करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.
 
अन्नधान्य झाले स्वस्त 
 
ग्राहक किंमत निर्देशांकवर आधारित किरकोळ महागाई एप्रिलमध्ये ३.१६ टक्के आणि मे २०२४ मध्ये ४.८ टक्के होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात अन्न महागाई ०.९९ टक्के होती, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्यात ८.६९ टक्क्यांपेक्षा खूपच कमी आहे. मे २०२५ चा अन्न महागाईचा हा आकडा ऑक्टोबर २०२१ नंतरचा सर्वात कमी आहे.
 
एनएसओने काय म्हटले?
 
एनएसओने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की मे २०२५ मध्ये मुख्य चलनवाढ आणि अन्न चलनवाढीतील घट मुख्यतः डाळी आणि त्यांच्या उत्पादनांच्या किमती, भाज्या, फळे, धान्य आणि त्यांच्या उत्पादनांच्या किमती, घरगुती वस्तू व सेवा, साखर, मिठाई, अंडी यांच्या किमतीत झालेली घट ही अनुकूल आधार परिणामामुळे झाली आहे.यापूर्वीच आरबीआयनेही व्याजदरात ०.५० टक्के कपात केली आहे. 

Related Articles